तलाठी भरती आता MPSC घेणार. १७०० हून अधिक पदांसाठी लागा तयारीला.
Published
06 May 2026, 01:06 PM
मुंबई: महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागात नोकरीची सुवर्णसंधी शोधणाऱ्या तरुण इच्छुकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने आगामी तलाठी भरती २०२६ साठी वेगाने हालचाली सुरू केल्या असून, महसूल विभागाने रिक्त असलेल्या १७०० पेक्षा जास्त पदांच्या भरती प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवला आहे. विशेष म्हणजे, यावेळची भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी परीक्षेच्या स्वरूपात ऐतिहासिक बदल करण्यात आले आहेत.
रिक्त जागांचा अहवाल ८ मे पर्यंत सादर करण्याचे आदेश -
महसूल व वन विभागाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना त्यांच्या क्षेत्रातील रिक्त पदांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. ८ मे २०२६ पर्यंत सर्व जिल्ह्यांच्या रिक्त जागांचे 'मागणीपत्र' शासनाला सादर करण्यास सांगितले आहे. या अहवालानंतर जिल्ह्यानिहाय नेमक्या किती जागा आहेत, याचे चित्र स्पष्ट होईल. अंदाजानुसार, ही भरती १७०० हून अधिक पदांसाठी असणार आहे.
आता MPSC कडे जबाबदारी -
यापूर्वीच्या तलाठी भरतीमध्ये खाजगी कंपन्यांमार्फत (TCS/IBPS) परीक्षा घेताना अनेक तक्रारी आणि तांत्रिक अडचणी समोर आल्या होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने ५ मे २०२६ रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. या निर्णयानुसार, आता तलाठी (गट-क) सह सरळसेवेची एकूण ४६ पदे थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरली जाणार आहेत. यामुळे परीक्षेचा दर्जा वाढणार असून पारदर्शकता अधिक सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पात्रता आणि परीक्षेचे स्वरूप -
शिक्षण: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduation) आवश्यक.
निवड प्रक्रिया: केवळ लेखी परीक्षेच्या गुणांवर आधारित निवड केली जाईल; मुलाखतीची अट रद्द करण्यात आली आहे.
संभाव्य जाहिरात: जुलै २०२६ च्या पहिल्या आठवड्यात अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता आपला फोकस 'MPSC' च्या पॅटर्ननुसार वाढवणे गरजेचे आहे. आयोगाच्या नियोजित वेळापत्रकामध्ये लवकरच तलाठी परीक्षेच्या तारखांचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे.
Last updated on 06 May 2026, 01:12 PM